बदलापूर आरोपीचा एन्काऊंटर, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,.

ऑनलाईन माळी साम्राज्य – बदलापूर बाल लैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर (Encounter) झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अक्षय यांच्या झडापट झाल्यानंतर अक्षयला पोलिसांकडून गोळी झाडण्यात आल्याचे समजते.
मात्र, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी ही गोळी झाडल्याचंही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय नेतेही या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून पोलिसांच्या या कृत्यावरच अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. कहर म्हणजे जे विरोधक अक्षयला फाशी द्या म्हणत होते तेच विरोधक आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यान, फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून तात्काळ टीमही नेमण्यात आल्याचे समजते. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनीही या घटनेची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
दुसरीकडे बदलापूर अत्याचार (Badlapur) प्रकरणातील सरकारचे वकील अॅड. उज्ज्वल निकम (Ujjwa nIkam) यांनी प्रतिक्रिया देताना, याची न्यायालयीन चौकशी होईल, असे म्हटले आहे. बदलापूर आरोपीवरील गोळीबारप्रकरणी घटनेची न्यायालयीन चौकशी (Akshay Shinde Encounter) होईल, त्यासंदर्भात आज काहीही बोलणं योग्य होणार नाही. याबाबत मला अधिकृत माहिती आज नाही, माझं कुठल्याही अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं नाही, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले. तसेच, आत्तापर्यंतच्या तपासात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार, आरोपी विरुद्ध भरपूर पुरावे एसआयटीला उपलब्ध झाले होते. आरोपीला देखील आरोपपत्राची कॉपी मिळाली होती. माझ्या अनुभवानुसार काही आरोपींना आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत असतो, त्यातून त्याने हे पाऊल उचललं असावं, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले.